महाराष्ट्रात मान्यता पावलेल्या एका व्यंगचित्रकाराने गेल्या वर्षी एका दिवाळी अंकातल्या मुलाखतीत तर असे म्हटले होते, 'दलालांनी आपली कला सतत प्रवाहिनी ठेवली, तेच तेच करण्याच्या डबक्यात रुतली नाही. त्यांच्या इतक्या बदलत्या पद्धती (स्टाईल्स) निर्माण केलेल्या कलाकृती पाहिल्या की मनात येते, महाराष्ट्रातच काय, जगात कोणी अशा व इतक्या विविध पद्धतींनी चित्रे काढली नसावीत!'
हे वाचून खरे म्हणजे मीही विस्मयचकित झालो होतो. आपल्या कलाकृतीची अशा तऱ्हेची कौतुकाची प्रतिक्रिया जेव्हा जेव्हा मी अनुभवतो, तेव्हा मला अपार आनंद व्हायला हवा होता. काहीतरी या कलाविषयात माझ्याकडून भरीव घडले आहे, असे वाटून मूठभर मास वाढले आहे - असे भासायला हवे होते... पण...
कुठेतरी खोल मनात दडलेली अतृप्तता-इच्छा मला नेहमीच अस्वस्थ करत असते. जनसामान्यांपासून ती तथाकथित प्रतिष्ठित आणि सुशिक्षित वर्गातील रसिकांकडून दाद घेत असलेल्या माझ्या कलेला तशीच मनमोकळी साद विद्वान, कलारसिक किंवा प्रौढ व प्रगल्भ विचारवंत चित्रकारांकडून मिळाली नाही. क्षणभर स्तिमित करील, त्यांच्या सुजाण बुद्धिमत्तेला आव्हान देईल अशी काहीतरी भरीव सृजनशील कलानिर्मिती माझ्याकडून व्हायला हवी होती. व्यावहारिक फापटपसाऱ्यात मनात असूनही हे अत्यंत महत्त्वाचे कार्य माझ्याकडून घडू शकले नाही, याची खंत मला नेहमीच अस्वस्थ करीत असते. या अस्वस्थतेची जाणीव जोपर्यंत माझ्या मनात जागृत आहे; तोपर्यंत त्या प्रतिभेचा महान स्पर्श मला निश्चित लाभेल आणि माझ्या हातून काही अविस्मरणीय आणि सृजनशील कलानिर्मिती निर्माण होईल, असे मनोमन वाटते - तसा आत्मविश्वास वाटतो! होय, आत्मविश्वास! कलावंत या विश्वासावरच जगत असतो!